Ticker

6/recent/ticker-posts

*अर्थसंकल्पातील तरतुदीत कपात हा आदिवासींवर घोर अन्याय - अॅड. वामनराव चटप* *'सशक्त कोलाम - समृद्ध माणिकगड' अभियानाचे थाटात शुभारंभ व भीमदेव मंदिराचे भुमिपुजन*

*अर्थसंकल्पातील तरतुदीत कपात हा आदिवासींवर घोर अन्याय - अॅड. वामनराव चटप*

*'सशक्त कोलाम - समृद्ध माणिकगड' अभियानाचे थाटात शुभारंभ व भीमदेव मंदिराचे भुमिपुजन*

( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती, ता. ३ - पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा येथील बालमृत्यू व गर्भार माता मृत्यूच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन राज्य सरकारने सुखटणकर समिती नेमली व या समितीने आदिवासी क्षेत्राचा सर्वंकष अभ्यास करून राज्याच्या वार्षिक योजनेतून आदिवासीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी शिफारस केली होती. त्यानुसार सन १७-१८ पर्यंत ही तरतुद सुरू होती. मात्र, सन १८-१९ च्या अर्थसंकल्पापासून ही तरतूद कमी करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात राज्यातील आदिवासींची लोकसंख्या ९.०४ टक्के असताना राज्य सरकारने दिड लक्ष कोटीच्या वार्षिक योजनेत साडेतेरा हजार कोटी रुपये तरतूद करणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ११ हजार १९९ कोटींची तरतूद करून आदिवासी समुदायावर घोर अन्याय केला आहे. यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील प्रत्येकी १४४ कोटींची तरतूद कमी झाल्याने कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू व गर्भार माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे व याशिवाय आदिवासी बहुल क्षेत्रातील आदिवासी विकासाला खिळ बसणार असल्याचे सुचक विधान माजी आमदार अॅड वामनराव चटप यांनी केले. 
    जिवती तालुक्यातील रायपूर (खडकी) येथे कोलाम विकास फाऊंडेशनच्या 'सशक्त कोलाम- समृद्ध माणिकगड' या जन अभियानाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. तत्पूर्वी प्राचार्य संभाजी वरकड यांचे हस्ते भीमदेव मंदिराचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी रायपूर (खडकी) या कोलाम गुड्याचा लोकसहभागातून व विविध शासकीय योजनांमधून सर्वांगिण विकासाचा संकल्प करण्यात आला. या सोहळ्यात आयुक्त कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नेताजी झाडे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. पी. गेडाम, सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती निळकंठराव कोरांगे, घुमांतू संघटनेचे प्रा. मोहन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दिपक साने, नितीन काळबांडे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्य अध्यक्ष बादल बेले, जिल्हाध्यक्ष संतोष देरकर, तालुका संघटीका सुनिता कुंभारे, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप आदे, आशिष करमरकर, इंजिनिअर ललित वाढई, सचिव मारोती सिडाम, बंजारा विकास फाऊंडेशनचे अरविंद चव्हाण, गाव पाटील बाजीराव कोडापे, खडकीचे जैतू कोडापे, धनकदेवीचे लिंबा कोडापे, कलीगुडाचे गावपाटील रामा सिडाम व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
     आदिम कोलामांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशनने सुरू केलेल्या जनअभियानाला सहयोग करण्याचे आवाहन करून रायपूर येथे भीमदेव मंदिरासोबतत वाचनालय सुरू करण्यासाठीही आमची संस्था पुर्ण सहयोग करण्यासाठी अग्रेसर राहील असे वक्तव्य प्राचार्य संभाजी वरकड यांनी केले. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी कोलामांना शोषण व्यवस्थेतून बाहेर काढून सन्मानाचे जिवन जगता यावे यासाठी युवकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी आपली संस्था शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 
या सोहळ्याचे संचालन देवू कोडापे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्राम विकास समितीचे अध्यक्ष नामदेव कोडापे, झाडू कोडापे, विलास कोडापे, आयू सिडाम, वासुदेव सिडाम, तुकाराम कुमरे, बारिकराव कोडापे, भिमबाई कोडापे, आयूबाई कोडापे, संघर्ष पडवेकर व अन्य गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. कोलामी ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments