Ticker

6/recent/ticker-posts

*💥 विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण: दिवसातून किती वेळा जाते याची गिणती करणे कठीण*




*जनवार्ता भारत डॉट कॉम*
पोंभूर्णा:उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असताना, वेळी-अवेळी वीज जात असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होत असल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. वीज पुरवठा अचानक खंडित होण्याच्या प्रकारांमुळे व विद्युत दाब कमी-जास्त होण्याच्या प्रकारामुळे पंखे व कुलर बंद पडल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त बनले आहेत.जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाल्याने कुणी घरी, तर कुणी दुकानात कुलर, पंख्याचा वापर करतात. अशा स्थितीत दिवसभर वीज पुरवठा बंद राहत असल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला. महावितरणकडून दुरुस्ती कामासाठी वीज पुरवठा बंद राहणार असेल, तर तसे ग्राहकांना एक-दोन दिवस आधी मोबाइलवर ‘एसएमएस’ द्वारे कळविले जाते. परंतु, वीज पुरवठा दिवसभर  बंद राहणार असल्याचा कुठलाही संदेश न देता अचानक वीज पुरवठा बंद केला जात असल्याने वीज ग्राहक वैतागले आहेत. पंखे - कुलर बंद पडत असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.  प्रत्येक गावामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. व्होल्टेजच्या समस्येमुळे पंखे, कुलर, टीव्ही, फ्रीज खराब होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. 

*शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठ्याची गरज-*

 विजेच्या समस्येमुळे शेतीसाठी देखील सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वीज ग्राहकांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे उन्हाळी, धान पिके, भाजीपाला सुरक्षित राहण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असते. अशावेळी वीज पुरवठा महत्त्वाचा असतो. तसेच आठवडाभरापासून तापमानातही वाढ झाल्याने वीज पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे बनले आहे. यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वच स्तरातून व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments